का जगायचं? - पु.ल.

 पुलं चे नातेवाईक, चंदू ठाकूर हे हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान-अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्या पत्राचे पुलंनी लिहिलेल्या उत्तराचा काही भाग.. जीवन का जगावं इथपासून त्यातला सगळ्यात मोठा आनंद कुठला इथवर सगळं सगळं अगदी अलगद गाठ सोडल्यासारखे पुलं इथे सांगतात !

१० जुलै १९५७,
प्रिय चंदू.

तुला वाटतं "मी फ्लाईंग का करावं?" – चंदू, अरे कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तर फूल म्हणजे काय असतं रे? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.
जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार आपल्याला अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो, ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात !

जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं. मग कुठल्याही क्षेत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे तर तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग, कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा स्वार्थ आणि क्षुद्रपणा माझ्यातही कुणाला आढळणार नाही ना, याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.

तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग ! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!

तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified.

My dear boy, whose deaths are justifiable?

माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?

ज्या दिवशी जन्माला येणं justifiable होईल त्या दिवशी आपण मरणाचं justification शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे

कळावे,
भाई.

Comments

Popular posts from this blog

Resize table columns of html table

Compress file size in browser...... Just Like That !!

AXIS bank complaint - refusal to issue FREE ATM card